Wednesday, June 19, 2013

माझा खेळ मांडू दे.....!


मनी आणि टिनी “साप-शिडी” खेळतायत.
“याहू, मला शिडी मिळाली. मी ९६ वर आले.. आता फक्त ४ पडले की मी जिंकले...” मनी खुश होऊन म्हणते.
टिनी बिचारी खूप मागे पडलीये. मनी अगदी विजयाच्या जवळ आलीये हे पाहून तिला जरा वाईट वाटतंय पण करणार काय? ती गुपचूप दान टाकते. चार घरं पुढे जाते. अरेरे, अगदी एकाने शिडी चुकली. जाऊदे. आता काय, मनी जिंकणार!
मनी ने उत्सुकतेने दान टाकलं. “४ पडूदेत, ४ पडूदेत” मनाशी धावा चालू होता. शेवटी धीर एकवटून तिने दान टाकलं. आणि बघते तर काय? २ पडले.
“अरे देवा, ९८ वर एक भला मोठा साप. गिळून टाकलं त्याने मनी ला. एकदम खाली दुसऱ्या घरात पाठवलं तिला.  मनी जिंकता जिंकता राहिली. आता काय, २ म्हणजे खेळ पुन्हा पहिल्यापासून सुरु केल्यासारखं आहे. पण इलाज नाही. मनी खट्टू झाली.
मघाशी मागे असलेली टिनी त्यामुळे एकदम पुढे गेली. अर्थात तिलादेखील कुठे माहित्ये की पुढे काय होणार? ती जिंकणार की मनी पुन्हा पुढे जाणार? हीच तर या खेळाची गम्मत आहे. काहीच सांगता येत नाही आधी, पुढे काय होणार ते!
एका मैत्रिणीच्या घरी सापशिडीचा खेळ एका कापडी पटावर खूप अभिनव पद्धतीने तयार केलेला मी पाहिला. गंमत म्हणून आम्ही दोघी तो खेळू लागलो. मोठेपणी खेळताना, इतक्या वर्षांनी अचानक मला जाणवलं की या खेळाचं सूत्र “आयुष्यातली अनिश्चितता” याच खऱ्या आयुष्यातल्या गूढ बाबीवर आधारलेलं आहे. पटावरच्या शिड्या म्हणजे आपल्याला मिळणाऱ्या संधी आणि त्यामुळे होणारी आपली प्रगती तर साप म्हणजे अधोगतीकडे नेणाऱ्या गोष्टी किंवा घटना जसं अपघात, लबाडी, खोटेपणा, फसवणूक इत्यादी.
म्हणजे, आपण आपलं दान टाकत रहायचं आणि एक एक घर पुढे जात रहायचं. साप आणि शिड्या दिसत तर असतात पण त्या मिळतील की नाही हे आपल्या हातात नसतं. कारण दान टाकणं जरी हातात असलं, तरी नेमका हवा तोच आकडा येईल कशावरून?
हा खेळ ज्या कोणी शोधून काढला त्याने हाच विचार केला असेल का? या कुतूहलापोटी
या खेळाचा इतिहास शोधायचा प्रयत्न केल्यावर कळलं की या खेळाचा उगम भारतातलाच. “मोक्ष पतामू” या नावाने हा खेळ प्राचीन भारतात खेळला जाई. त्या ही आधी, १६व्या शतकात, हा मूळ जैन खेळ “लीला” या नावाने ओळखला जाई. आपल्या दैनंदिन आयुष्याचं प्रतिबिंब दाखवणाऱ्या या खेळामागच्या हिंदू विचारसरणीमुळे प्रभावित होऊन हा खेळ इंग्लंडमध्ये एका वेगळ्या प्रकारे तयार केला गेला. 
“मोक्ष पतामू” या नावाने हा खेळ बहुदा भारतीय अध्यात्मिक गुरूंनी तयार केला तो लहान मुलांना चांगल्या कृतींच महत्त्व पटवण्यासाठी. शिड्या म्हणजे विश्वास, खरेपणा, उदारपणा यासारख्या गुणांचं प्रतिक तर साप म्हणजे चोरी, खून, राग, हाव किंवा लालसा यांसारखे वाईट गुण! या खेळाचा उद्देश म्हणजे सद्गुणांचा वापर करून दुर्गुणांवर विजय मिळवून मोक्षप्राप्ती करणे हा असे. चांगल्या वागणुकीमुळे मोक्ष मिळेल तर वाईट वागल्यास किडामुंगीचा जन्म मिळेल. शिवाय शिड्यांची संख्या सापांपेक्षा कमी ठेवून, खऱ्या आयुष्यात, सद्वर्तनाचा मार्ग हा पापाच्या मार्गापेक्षा खूप खडतर आहे हेच सुचवायचं आहे.
पहा नं, सापशिडी सारख्या साध्या खेळाच्या निर्मितीमागे मनोरंजनापलीकडे असा काही उद्देश असेल असं आपल्याला वाटतं तरी का?
आता दुसरा खेळ घ्या. पत्त्यांचा...”भिकार-सावकार”. या खेळात देखील तेच सूत्र.
दोघांनी दोन गठ्ठे करून पत्ते वाटून घ्यायचे. ते उलटे ठेवायचे आणि एक एक पान सुलटत जायचं. कुठल्या रंगाचं पान येईल ते आपल्याला माहित नसतं. नशिबानेच तुम्ही त्यात भिकारी किवा सावकार होता. बरे, या खेळाला काही बाकी नियम नाहीत त्यामुळे लहान मुलांना आधी हाच खेळ शिकवला जातो. नियमांची क्लिष्टता त्यांना कळणार नाही म्हणून मग हा सोपा खेळ. नुसतं आपलं पान सुलट करत जायचं, पुढे काय होईल ते होईल. आता हेच आपल्या आयुष्याचही गमक नाहीये का? आपण आपलं काम करत जायचं, जिंकण्यासाठीच प्रयत्न करायचे पण अंतिम निकाल आपल्या हाती नाही. आहे की नाही गंमत?
या दोनच खेळांविषयी मी लिहिण्याचं कारण म्हणजे हे दोन्ही खेळ नशिबावर अवलंबून खेळावे लागतात. त्यांना काही विशेष नियमावली नाही आणि कोणती “strategy” ही नाही. आणि हेच दोन खेळ सर्वात आधी आपण शिकतो आणि खेळतो.
हे खेळ ज्यांनी कोणी तयार केले त्यांनी लहानपणीच मुलांना “आयुष्यातल्या जुगाराचे” बाळकडू दिल्यासारखं आहे नाही? म्हणजे असं मला वाटतं. फक्त ते समजण्या इतकी प्रगल्भता मुलांमध्ये नसते. या खेळांमधून इतक्या लहान वयातच आपल्याला आपल्या पुढील आयुष्याबद्दल थोडी कल्पना मिळते. किंवा “आयुष्य म्हणजे काय” याची एक झलक या खेळांमधून मिळते असं म्हटलं तर ते अधिक योग्य होईल. मी सुरुवातीला लिहिलेला किस्सा आपल्या लहानपणी आपण प्रत्येकाने अनुभवला आहे की नाही?
खरं तर आपल्या आयुष्याला अजाणतेपणी सुरुवात करताना, लहान मुलांना हे असंच आपलं आयुष्य असतं हे कळलं तर किती छान होईल. म्हणजे ती लहानपणीच अगदी तय्यार होतील. आयुष्यातल्या अनेक चांगल्या वाईट गोष्टी पचवण्यासाठी. पण तसं होत नाही. कारण जसजसे आपण मोठे होतो, अनुभव घेतो, तसतसं आपल्याला आयुष्याचा अर्थ उलगडत जातो. पण म्हणतात नं, कुठल्याही गोष्टीला short cut नसतोच कधी.
मोठेपणी आपण हे खेळ विसरूनही गेलेलो असतो. मग पुन्हा ते खेळ येतात आपल्या मुलांच्या निमित्ताने. तोपर्यंत आपण त्यातल्या बऱ्याचशा शिड्या चढलेल्या असतात आणि अनेक सापही पाहिलेले असतात. त्यामुळे पुढच्या आयुष्याची कल्पना नसलेल्या निरागस मुलांइतक्या उत्साहाने आपण तो खेळ मोठेपणी नाही खेळू शकत.
अगदी कळायला लागतानाच जे लहानांना खेळांमधून अप्रत्यक्षपणे शिकवलं जातं ते समजून घेण्याची त्या वयात त्यांची कुवत नसते. आणि जेव्हा ती कुवत येते, तोपर्यंत ते बालपण संपलेलं असतं. ती प्रगल्भता येण्यासारखी आयुष्यातली ही अनेक वर्ष घालावावीच लागतात. म्हणजे जे गमक लहानपणीच कळलं तर आपलं आयुष्य खूप समजून जगता येईल असं वाटतं, ते खऱ्या अर्थाने कळायला आपल्याला मोठंच व्हावं लागतं.

(नवशक्ती या वर्तमानपत्रासाठी मी "गूढनवल" हे सदर लिहीत असे. त्यातला हा एक लेख)

3 comments:

  1. Great sharu.. tu je lihila ahes te tantotanta khara ahe ani aplya rojchya ayushyat saglyanchyach babtit te ghadat asta.
    khaas karun aplya field madhe...

    Aur likhto raho.. :-)

    ReplyDelete
  2. chhan lekhmalika suru kelis sharu

    ReplyDelete

आपले मत जरूर मांडा.... :-)