Monday, September 23, 2013

पिढी..


“जी गेली ती ती नव्हतीच. नाही, ही ती असूच शकत नाही.
ती कशी होती...तजेलदार, खुटखुटीत, हसरी, बडबडी, अत्यंत आग्रहाने आणि प्रेमाने आल्या-गेल्याला खाऊ पिऊ घालणारी. सगळा जीव त्या जेवणात अडकलेली. 

काल जी गेली ती ही माझी आजी नव्हतीच. किती वेगळी दिसत होती काल. तिच्या घरात इतकी माणसं जमलेली असून ती मात्र शांत झोपली होती. एरवी हे केवळ अशक्य. एरवी ती स्वयंपाकघरात असली असती. “हे खा गं, ते घे रे अजून...कसं झालंय? अं....आजीच्या हातासारखी चव मिळेल का कुठे?” असं डोळे मिचकावत म्हणणारी माझी आजी गेली होती. आजपर्यंत तिच्या घराला जिवंतपणा केवळ तिच्यामुळे होता....आणि आज मात्र तिच्यासाठीच जमलेल्या इतर लोकांच्या उपस्थितीने ते घर उगाच केवीलवाणे जिवंत होऊ बघत होतं. आपली माणसे दिसल्यावर डोळ्यात चमक येणारी आजी मात्र आज शांत होती.

माझी ही आजी खास होती खरंच. फक्त स्वतःच्या नातवंडांवर नव्हे तर आम्हासारख्या मावस-चुलत वगैरे सगळ्यांवर तिची सारखीच माया होती. तिच्यामुळे माझी न्याहारीच्या भाकरीच्या काल्याशी ओळख झाली. त्याची चव आजीकडे जशी लागायची नं तशी कुठ्ठेही नाही. जीवन भरभरून जगण्याची उमेद मी तिच्यात पाहिली. लग्नानंतर अत्यंत सुस्थितीत असलेली माझी ही मावस आजी त्या काळात तर लोकांचं मुक्तहस्ते करायचीच. पण नंतर नंतर परिस्थिती काहीशी बदलल्यानंतर देखील ती होती तशीच होती. भरभरून देणारी. आलेल्या संकटांनी कधी उदास झालेली मला ती दिसलीच नाही. माझी सख्खी आजी, म्हणजे हिची मोठी बहिण, ती देखील अशीच खंबीर. हाडांच्या अतिशय दुर्मिळ अशा आजारामुळे २० वर्षं तिने अंथरुणाला खिळून काढली पण धीराने आणि संयमाने. कधी त्रागा नाही. स्वतःला चालता-फिरता येत नाही म्हणून आमचं कौतुक कुठे कमी नाही.

या पिढीत एक खंबीरपणा मुळातच असावा असं मला वाटतं. एकत्र कुटुंबात राहिल्यामुळे असेल, अनेक भावंडं असल्यामुळे असेल, तसे संस्कार झाल्यामुळे असेल, आपण एकटे नाही घरात बरेच लोकं आहेत या विश्वासामुळे असेल पण ही पिढी खमकीच एकूण.

या अशा आज्या आता असणार आहेत का यापुढे? की ही आता दुर्मिळ होत जाणारी जमात होणारे? माझ्या आई-बाबांची जी पिढी आहे त्या पिढीत असतील किंवा आहेत अशा आज्या...पण हळू हळू हे कमी होणारे नाही का? कारण आता पिढ्या किती बदलत चालल्या आहेत. घराला वाहून घेणाऱ्या, आणि तेही आनंदाने, स्वखुशीने करणाऱ्या गोडू गोडू आणि जाडू जाडू असणाऱ्या, पदराला हात पुसत बाहेर येणाऱ्या, स्वयंपाकघरात मन रमणाऱ्या, कुटुंबाला पोटभर प्रेमाने खाऊ घालण्यात सर्वोच्च सुख मानणाऱ्या आया आणि आज्या आता खरंच दुर्मिळ होणार आहेत.  

माझा सत्तरीच्या घरात असलेला मामा माझ्या आईला म्हणत होता की “आता मुलांना माणसे, नातेवाईक नको असतात गं. पूर्वीसारखं राहिलं नाही. जाणं-येणं किती कमी झालंय”. हे खरंच आहे. पण ही पिढी, जी आपल्या आई-बाबा आणि सासू-सासऱ्यांना घाबरून राहिली ती आता आपल्या मुलांना घाबरून रहाते. घाबरून म्हणजे त्यांच्या आयुष्यात आपल्यामुळे काही अडथळा नको, आपल्यामुळे त्यांचा वेळ जायला नको असा विचार करत रहाते कारण ती बिचारी आजच्या मुलांची ओढाताण, धावपळ बघत असते. ती समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. बदलता काळ हेच याचं कारण असलं तरी शेवटी त्यात भरडली जाते ती ही आता वयापरत्वे हळुवार झालेली, माणसांची सवय असलेली पण आता त्यांची कमतरता जाणवणारी जुनी पिढी. जुनी! हा शब्दच किती त्रासदायक आहे नं. जुन्याने मागे होऊन नव्याने पुढे येणे हे नैसर्गिकच आहे पण जेव्हा त्या जुन्या पिढीत आपल्याला आपले एकेकाळी कर्तुत्ववान असलेले आई-बाबा, मामा-मामी, आणि काका-काकू दिसू लागतात, तेव्हा काळजात कळ येते. 

पुण्याची आजी गेली आणि अशीच कळ उठली. कुठलीही अपेक्षा न करता फक्त प्रेमानेच न्हाऊ-माखू घालणारी ही आजी आता पुन्हा कधीच मला दिसणार नाही. सर्वांसाठी जिच्याकडे नेहेमीच वेळ असायचा तिची इथली वेळ संपली.

तिच्याकडून मिळालेला वात्सल्याचा आणि मायेचा वारसा मी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू शकेन का? आणि मी प्रयत्न केला तरी पुढची पिढी तो घेण्याच्या मनोवस्थेत असेल का? हे सगळं करायला, व्यक्त व्हायला लागणारा वेळ माझ्याकडे आणि तिच्याकडे तरी असेल का?


Monday, September 16, 2013

कोलाहल!



मैत्रिणीच्या गावातल्या निसर्गाकडून अंगात शोषून घेतलेला शांतपणा मला आनंद देतोय न देतोय तोच सुरु झाला ... आपल्याकडे दर महिन्याला वेगवेगळ्या कारणांनी निर्माण होणारा...
एक कोलाहल!


गणेशोत्सवाच्या निमित्ताने परत एकदा अंगावर आला तो म्हणजे प्रसारमाध्यमांचा कोलाहल. अरे हो, हळू हळू सांगा नं सगळं. किती वेगवेगळे मुद्दे म्हणजे अनेक गंभीर गुन्हे, छोटे-मोठे गुन्हे, राजकारण, सिनेमे  आणि गणेशोत्सव सगळं काही एकाच वेळी एकामागोमाग एक चालू. जराही उसंत नाही. भडीमार सगळ्याचा. कोण कसा गणेशोत्सव साजरा करतोय हे दाखवण्यात तर ऊत आलाय सगळ्यांना.

मला तर असं वाटतं की आता या उत्सवांच्या सार्वजनिक स्वरूपावर मर्यादा आणावी (त्याला कोणी भीक घालेल का शंका) त्यापेक्षा बंदीच आणावी. इथे रुपया घसरतोय, आपली बायिंग पॉवर क्षीण होत चाललीये, राजकारणात अनेक उलथा-पालथी होऊ घातल्या आहेत, देशात स्त्रियांना बाहेर पडायला भीती वाटावी अशी परिस्थिती निर्माण होऊ लागलीये, नरेंद्र दाभोलकरांसारख्या सामाजिक भान असणाऱ्या माणसाची दिवसा ढवळ्या हत्या होते, त्यांचे खुनी अजून सापडत नाहीत या अशा सगळ्या कोलाहलात गणेशोत्सव साजरे करण्यात पैसे आणि वेळ घालवायचा...पोलिसांना रहदारी सांभाळण्याच्या अतिरिक्त कामात व्यस्त ठेवायचं...त्यापेक्षा आपण घरच्या घरी नाही का हा उत्सव साजरा करू शकणार? या कोलाहलातून आपल्याला काय मिळतंय? फक्त आवाज, ध्वनी. आत पोचणारं असं काहीच नाही. मोठ्या आवाजातली गाणी, सिने तारकांबरोबर आरत्या, झगमगाट, नृत्ये, टी.व्ही वर कव्हरेज ही खरी भक्ती नव्हे हे आपल्या प्रत्येकाला माहित्ये. एका प्रसिद्ध देवाच्या पायाशी एक क्षण डोकं ठेवू इच्छिणाऱ्या भक्तांना उद्दामपणे ढकलणारे कार्यकर्ते पाहून तर हद्दच झाली. अरे काय चाललंय काय? आणि लोकं सहन का आणि कसं करतायत? इतर कुठल्याही प्रगत देशात, दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव सारख्या विविध सणांमुळे नागरिकांचं सामान्य जनजीवन विस्कळीत होत नसेल. प्रगतीचं एक पाऊल पुढे टाकत असताना, दोन पावले आपण अशी मागे का येतोय?

देवदेखील हा कोलाहल बघून, मोठ-मोठ्या मूर्तींमध्ये वसत नाही हे का कळत नाही लोकांना. देवाची भक्ती ही फक्त आपल्या मनात शांतपणे एका क्षणात देखील होते. देवाला बघायला खरं तर कुठेही जावं लागत नाही. तो आपल्याला आपल्या मनात भेटू शकतो. अगदी शांतपणे. 



मग या कोलाहलातून बाहेर पडून आपण सगळे शांत कधी होणार आहोत?