Thursday, September 4, 2014

आगंतुक!

अचानक एक दिवस माझ्या लक्षात आलं की माझ्या खिडकीत  मी न लावलेली अनेक झाडं आलीयेत. म्हणजे अक्षरशः बहरली आहेत. कसं काय? अर्थात याला वैज्ञानिक कारण आहे हे मला माहित आहे...शाळेत शिकलोय आपण ते....परागकण वाऱ्यामुळे उडून इतर ठिकाणी रुजतात  वगैरे...करेक्ट. पण मला असा विचार करायचा नाहीये. मला अर्थ लावायचा आहे .. किंवा शोधायचा आहे.

त्याला कारण आहे तसं.

मी सुद्धा  काही रोपं लावली होती. काही बिया आणि काही नाजूक रोपं. त्यांची खूप काळजी घेत होते मी. अगदी रोज उठून निगा राखत होते. अनेक महिने मी सतत बघत होते की बिया रुजतायत का? कोंब कधी फुटणार? पण मातीशिवाय काहीच दिसत नव्हतं. अगदी मनापासून हवं असलेलं एक रोपही लावलं होतं. गवती चहाचं. ते मोठं होईल आणि मग मी त्याचीच पानं घालून मस्तपैकी चहा पिईन असं ठरवलं होतं. ते उत्तम वाढण्यासाठी काही अटी होत्या. भरपूर सूर्यप्रकाश पाहिजे. पाणी खूप जास्त घालायचं नाही इत्यादी. मी माझ्या परीने निगुतीने प्रयत्न केला. पण ते नाजूक रोप काही जगलं नाही. काही बिया रुजल्या नाहीत त्या नाहीतच. म्हटलं आपण काय बरं करणार? मातीच्या खाली जाऊन कसं बघणार की यांचं काय बिनसलं? 

कोणीतरी एका दुकानात सहज म्हणून दिलेली गोकर्णची वेल मी लावली होती. ती थोडी वाढली आणि मग सुकून गेली. का बरं? मग लक्षात आलं की काहीतरी कीड होती बहुदा त्यामुळे ती वाढू शकली नाही.
माझी बाकी काही रोपं मात्र छान वाढत होती. सदाफुलीला रोज एक फूल येत होतं. तुळस छान बहरत होती. मनीप्लांट पण उत्तम वाढत होतं. पण ही काही रोपं मात्र खूप काळजी घेऊनही आणि खूप आशा लावूनही रुजली नाहीत, वाढली नाहीत, बहरली नाहीत. ती गेलीच. सुकली. मग मुळापासून उपटून फेकून देण्यापलीकडे काही पर्याय नव्हता. तेच केलं. करावं लागलं. आता ती समोर नाहीत. त्यामुळे वाईट वाटत नाही. पण आपण जो वेळ दिला तो फुकट गेला असं कधी मधी वाटतंच. आणि वेळ म्हणजे नुसता वेळ नाही तर त्यातली मानसिक गुंतवणूक. असो. 

म्हणूनच जेव्हा हे आगंतुक पाहुणे खिडकीत बहरलेले दिसले तेव्हा वाटलं की हे कुठून आले? माझ्या नकळत  माझ्या दारात त्यांनी रुजण्याचं काय कारण आहे? एका वेगळ्याच कुंडीतून जेव्हा गोकर्ण उगवली आणि बहरली तेव्हा वाटलं की हिला नव्हती का गरज माझ्या लक्ष असण्याची? मी पाणी घालण्याची? किंवा सूर्यप्रकाश मिळावा म्हणून कुंडी हलवून ठेवण्याची? ही वेल कशी आणि का आपण होऊन इथे उगवली? आणि दिसते तर इतकी सुंदर की रोज सकाळी खूप हिरवागार, हलणाऱ्या पानांचा आनंद मिळतो. हे न मागितलेलं कसं काय मिळालं मला इतक्या सहज? मी काही न करता. माझ्या खिडकीभर पसरलेली ती वेल  पाहून मला खरंच रोज आश्चर्य वाटतं.....किती सुंदर वेल....स्वतःहूनच तिच्या इतक्या फांद्या पसरल्या आहेत. किती मस्त वाटतं मला जेव्हा मला ती रोज दिसते. मग मी बिया पेरल्या होत्या तेव्हा तू अशी येऊन का गेलीस? का नाही वाटलं तुला तेव्हा बहरावंसं?

मग मी आता काय समजायचं यातून? की सहज मिळालेलं घ्यावं आणि आनंदी व्हावं. की काही मिळावं म्हणून फार मागे लागू नये. मग ते मिळणार नाही कदाचित. की अती तेथे माती?
म्हणजे हवं ते मिळेल याची खात्री नाहीच. नको ते मिळू शकेल. पण मग ते मुळात हवं होतं का नाही याला काही अर्थ नाही. ते अचानक मिळालं म्हणून आनंदी व्हा. हं...असंच काहीतरी बहुदा. नाही अजून नीटसं कळलेलं मला. 

नकळत उगवलेली वेल मात्र मला रोज दिसत्ये. ती वाऱ्यावर छान डोलत्ये. भरपूर वाढत्ये. देव जाणे मला काय सांगत्ये. 

आणि मी अजिबात वाट बघत नाहीये त्यावर सुंदर फूल कधी उगवेल याची!!






Tuesday, July 29, 2014

बघू....!


खूप उकडत होतं. खूपच. पण सवय झाली होती तशी उकडून घेण्याची. घामाघूम होण्याची. होतेच नं आपल्याला सवय हळू हळू. सगळ्याचीच. आवडत नसतं अजिबात. पण इलाज नसतो. आवडत नसलं तरी चालवून घेतो आपण. उपाय शोधतो. काहिली कमी करण्याचे. दिवस तसेच घालवतो. आपलं आपलं काही नं काही करत. सूर्याचं रूथलेस तळपण सहन करतो आपण. नकळत मनात पावसाची आठवण येऊ लागते. तोच सोडवणार असतो आपल्याला या त्रासातून.

खूप वाट पहायला लावली त्याने. पण आला. उशीरा का होईना तो आला. छान बरसू लागला. उन्हाची झळ पाण्यात वाहून गेली. हे कसं बेस्ट आहे असं वाटू लागलं. थोडं पाणी साठणं, चिकचिक फारशी मनावर नाही घेतली. त्याचं येणं महत्वाचं होतं. आता त्यात कुठे आणि तक्रारी करत बसायचं. छान वाटत होतं.

मग तो खूपच कोसळायला लागला. कोसळतोच आहे. अरे बापरे! एकदम असं कसं? सततची छान हवा सुद्धा मानवत नाहीये. काय करायचं या सुंदर हवेचं? काहीजणांना आवडत नाहीये हे झाकोळलेलं आभाळ. त्यांना लख्ख उन हवंय. अरे? पण नको होतं नं आपल्याला हे उन काही दिवसांपूर्वी? डोळे वर करून बघताही येणार नाही इतकं जास्त उन दिलं होतं आपल्याला. नको होतं ते तसं. थोडं कमी चाललं असतं. आणि आता थोडं हवंय.

उन-पाऊस, पाऊस-उन. 
थोडं जास्त, थोडं कमी.
आत्ता आहे त्यापेक्षा थोडं अधिक.
नको.
आधी होतं ते बरं होतं.

आजचा दिवस चालवून घेऊ.
बघू, उदया कसं असेल ते.
नाहीतर परवा तरी हवं तसं मिळेलच.
बघू...
बघतच राहू.

रोज!

Saturday, January 11, 2014

जुनं आणि नवं...!




गेल्या वर्षाच्या शेवटी शेवटी मला इतकी नवी आणि जुनी माणसे भेटली. खरं तर अख्खं वर्षं मी काही एक-दोन  गोष्टी घडतील किंवा घडाव्यात अशी वाट पहाण्यात घालवलं. बाकी सगळं विसरून तेव्हढाच विचार करत होते. पण गंमत म्हणजे तेव्हढंच, हवं तेच फक्त घडलं नाही. पण नजर वेगळीकडे वळवली आणि लक्षात आलं की इतर खूप वेगळ्या, छान  गोष्टी घडल्या आणि मग मनाला आनंद वाटायला लागला. आनंद वाटून घेणं, मानण शेवटी आपल्याच हातात असतं की. लहानपणीच्या, शाळेतल्या जुन्या मैत्रिणी भेटल्या. त्या आपल्या आयुष्यातलं काहीतरी चांगलं घडलेलं इथे इंडियात साजरं करायला आल्या होत्या. माझ्या बहिणीच्या जुन्या ऑफिसमधल्या आणि वयाने थोडया मोठ्या मैत्रिणी भेटल्या आणि परत लहान झाल्यासारखं वाटलं. भाच्याच्या मुंजीच्या निमित्ताने मामेबहिण आणि बाकी नातेवाईक भेटले. अनेकांची लग्ने झाली आणि त्याचे आनंदसोहळे झाले. नवीन कामांमुळे नवी मंडळी भेटली, नवे ग्रुप्स झाले. खूप म्हणजे खूपच भेटी-गाठी झाल्या. आपल्या मनासारखं घडलं नाही की आपण खट्टू होतो. त्या परिस्थितीत आपण एकटे आहोत असं वाटतं कारण ते आपलं एकट्याचं हरणं असतं. आपल्यापुरतं मर्यादित. संपूर्ण जगाच्या तुलनेत ते नेहेमीच छोटूसं असतं. पण आपण केलं तर आपल्यासाठी खूप मोठं. मला असं एकटे आणि निराश वाटू नये म्हणूनच त्या अज्ञात शक्तीने इतकी सगळी आवडती माणसे मला भेटायला इकडून तिकडून, विविध निमित्तानी जवळ आणली असं मानायला मला फार आवडतंय. ते खरंच आहे. मनासारखं न घडलेलं मागे सारून मी हे वर्षं शांतपणे संपवलंय आणि नव्या वर्षांत अगदी सहज प्रवेश केलाय. “जे आहे ते आहे” हे स्वीकारायला मी शिकले की काय? अरे देवा! :-)
 
गेल्या वर्षांच्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये मी नव्या गोष्टी आयुष्यात आणल्या, आपल्यातलं पोटेन्शियल जितकं वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येईल तितकं वापरण्यासाठी संधी निर्माण केल्या. त्यातूनच मी “छापा काटा” या मराठी नाटकाची फेसबुक पब्लिसिटी करण्याचं काम करायला घेतलं. पृथ्वीला हिंदी नाटके करताना आम्ही खूप वेगवेगळे व्हिडीयोज बनवायचो. पोस्टर्स रंगवायचो. जे काही क्रियेटीव्ह व्हायचं ते फेसबुकवरच्या आमच्या नाटकाच्या पेजवर जायचं. यातून सर्वांची क्रियेटीव्ह शक्ती तर कामाला यायचीच पण त्यामुळे नाटक खूप लोकांच्या नजरेला आलं. पाहिलं गेलं. हेच जर मराठी नाटकांसाठी केलं तर खूप फायदा होईल असं वाटलं कारण मराठी नाटकाला मुळात खूप प्रेक्षक असतोच पण त्यात तरुणांची भर घालायची असेल तर आजचं साधन म्हणजे सोशल मिडियाच आहे. ही आजच्या काळाची गरज मुक्ता बर्वे आणि दिनू पेडणेकर या निर्मात्यांनी ओळखली आणि या कामाला महत्त्व दिलं त्यासाठी त्यांचे आभार. छापा काटाचं फेसबुक पेज सजवण्यात आणि त्यासाठी एक केंपेन करण्याच्या निमित्ताने मी खूप शिकले. छोटे छोटे व्हिडीयोज शूट करून ते एडीट करायला शिकले. मला वाटतं की मराठी नाटकाचं असं पेज ज्यात व्हिडीयोजच्या माध्यमातून संवाद साधला गेलाय असं पहिल्यांदाच झालं असावं. टेक्नोलोजीमधे अप टू डेट राहणं हे फार महत्वाचं आहे हे नेहेमी वाटायचं आणि कळायचं पण ती खऱ्या अर्थाने शिकून तिचा उत्तम उपयोग करायला मी छापा काटामुळे शिकले. त्याचं खूप समाधान गेल्या वर्षाच्या शेवटी मिळालं आणि आजही मिळतंय. छापा काटाच पेज ३००० हून जास्त लोकांपर्यंत पोचलंय(लाईकस्).

गीतांजली कुलकर्णीबरोबर वाडा तालुक्यात तिथल्या तरुण मुला-मुलींसाठी 
सहाय्यकाच्या भूमिकेत राहून शिबीर घेतलं. तिथल्या मुलांची अभिनयाशी ओळख व्हावी हा मुख्य उद्देश असला तरी त्याचबरोबर त्यांना त्यांचं व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी याचा किती उपयोग होतोय हे लक्षात आलं. गीतांजलीने यापूर्वीच सोनाळा गावातील छोटया मुलांना शाळा शिकवणाऱ्या तरुण मुला-मुलींवर खूप काम केलंय. यातले काहीजण या शिबिरातही होते. इतरांच्या तुलनेत त्यांना किती आत्मविश्वास आहे स्वतःबद्दल हे अगदी स्वच्छपणे दिसून आलं. माझ्या या मैत्रिणीचं खूप कौतुकही वाटलं. हा उपक्रम नव्या वर्षांत आम्ही सुरु ठेवणार आहोत. खूप नवीन कल्पनांवर काम करतोय. फेसबुक पेजदेखील करूच ज्यामुळे अनेकांपर्यंत हा उपक्रम पोहोचेल. तिथल्या मुलांचा नियमितपणे नाटक करणारा ग्रुप तयार होऊ शकला तर हा उपक्रम यशस्वी होईल पण नाहीच तरी त्या मुलांना एक वेगळा दृष्टीकोन मिळेल आयुष्याकडे पाहण्याचा हे नक्की.

लेखन हा माझा अत्यंत आवडीचा विषय. त्याही क्षेत्रात नव्या दिशेने छोटी छोटी पावले टाकायला गेल्याच वर्षाच्या शेवटी शेवटी सुरुवात केली. या छोटया पावलांनी मोठं अंतर पार केलं की आणि तरच त्याबद्दल लिहीन....कदाचित आणि होपफुली या वर्षाच्या शेवटी शेवटी!

एकूण नव्या वर्षाचा संकल्प वगैरे काही नाही. या वर्षी इतकंच ठरवलंय की प्रत्येक दिवस जगत, अनुभवत पुढे जाऊया, वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही आघाडयांवर. त्यामुळे काय होईल की मनासारखं असं काही योजलेलं नसेल. त्यामुळे घडणारी प्रत्येक गोष्ट ही नवीच असेल. अपेक्षित नसेल त्यामुळे स्वीकारली जाईल किंवा विसरली जाईल. “नवे स्वप्न, नव्या आशा, नवीन सरप्राईजेस” या आणि अशासारख्या intangible शब्दांना आणि भावनांना या वर्षी माझ्याकडून काहीही मिळणार नाहीये. सॉरी, टाटा.

२०१४ कडून कुठलीही अपेक्षा न ठेवता, फक्त स्वतःकडून अपेक्षा ठेवत मी वाटचाल सुरुही केलीये. आणि खरंच फार छान वाटतंय....मोकळं मोकळं, निरभ्र आणि तजेलदार!

Sunday, November 24, 2013

प्लीज...



अरे हे काय चाललंय आपलं? आपण वाहन जबाबदारीने चालवणं का थांबवलंय?
कुठे पोचायचं असतं आपल्याला या अशा पद्धतीने गाडया आणि मोटार सायकली चालवून?
किती उदाहरणे देऊ लोक वेगवेगळ्या प्रकारे गाडी अत्यंत बेजबाबदार होऊन कशी चालवतात याची?

मोटार सायकलवाल्यांसाठी सिग्नल नसतात असं कुठे कोणी जाहीर केलंय का? म्हणजे असा काही कायदा मंजूर झालाय की काय? कारण लाल रंगाच्या सिग्नलला हल्ली बाईक्स चालवणारे अजिबात जुमानेनासे झाले आहेत. केव्हढी हिम्मत असते त्यांच्यात लाल सिग्नल बघूनही सरळ पुढे निघून जाताना. बरं, यात आपण कायदा पाळण्याची वगैरे फालतू सामाजिक जबाबदारी धुडकावून देतोय हा आविर्भाव (माज हा अधिक योग्य शब्द) असणारच पण तो कोणाला दाखवतोय आपण? हा माज दाखवताना, अत्यंत बेपर्वाईने आपल्या बाईक्स चालवताना आपल्याच जीवाला धोका आहे हे समजत नसेलच नं या मित्रांना? आपण घराबाहेर पडतो तेव्हा आई नेहेमी सांगते की नीट जा रे...हळू चालव बाईक. याला जगातलं कुठलंच घर अपवाद असू नये. पण मग या आईला काही कल्पना नसेलच नं असले बावळटासारखे प्रेमळ सल्ले देताना की आपलं बाळ आता खूप मोठं आणि जबाबदार (?) झालंय. त्याला आपण काही सांगून कळणार नाही. ते आपल्याला हवी तशीच बाईक चालवणार. सिग्नल धुडकावून, किंवा गाड्यांच्या डाव्या बाजूने सर्रास बाईक पळवत जाणारे, तारुण्याची नशा चढलेले, क्षणोक्षणी मृत्यूशी खेळणारे आणि आपल्यामुळे इतरांनाही खेळवणारे हे आपले बाळ पाहून या माउलीच्या काळजाचा ठोका चुकायचाच खरं तर. पण घरी बसून हे काही दिसत नसल्यामुळे एक तर “दृष्टीआड सृष्टी” असं म्हणणे किंवा पोरावर भाबडा विश्वास ठेवणे यापेक्षा फार काही करू शकणार नाहीच ती बिचारी.

हे झालं मोटार सायकलवाल्यांच. गाडी हाकणारे तसेच. एक तर नियम माहितीच नसणार किंवा सिग्नल तोडण्यासाठी असतात, गाड्या कुठेही पार्क केल्या तरी चालतात मग बाकीच्यांचा खोळंबा झाला, गैरसोय झाली तरी चालतंय ही बेफिकिरी. त्यात “एकाने गाय मारली तर मी वासरू का मारू नये” हा दृष्टीकोनही असतो. परवा लोणावळ्याहून एक्सप्रेस हायवेवरून येताना मधल्या स्लो लेनमधून जाऊ लागले तर अक्षरशः उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूंनी वेगाने गाड्या पुढे जाऊ लागल्या. मी हबकून गेले. ओव्हरटेक उजवीकडून करायचं असतं हा ही नियम मोडीत निघालाय. शेवटी मी तिसऱ्या लेनचा आधार घेतला. इथे निदान डावीकडून वाहन वेगाने येणं तरी टळेल.

खरंच खूप संताप होतोय माझा. रोज गाडी चालवताना हे असं बेशिस्त ड्रायव्हिंग पाहिलं की वाटतं कधी झालं हे असं सगळं? इतकं बेधडक? छोटया लेनमधून मोठ्या मार्गावर येताना जरा थांबून अंदाज घेऊन यायचं हे भान नाही. सरळ आपलं भसकन मुख्य रस्त्याला लागायचं. मग मुख्य रस्त्यावर वेगात येणाऱ्या गाड्यांना कसं कळणार तुम्ही कुठच्या क्षणी घुसणार ते? 
बर, सिग्नलला (पोलीस दिसतायत म्हणून) थांबताना झेब्रा क्रॉसिंगच्या इतक्या पुढे गाडया नेतात की ज्यांना हिरवा सिग्नल मिळालाय त्यांनाही जायला जागा मिळू नये.
आजच शिवाजी पार्कजवळ एका नो एन्ट्री चा बोर्ड ढळढळीत दिसत असलेल्या गल्लीत एक महाकाय गाडी सरळ समोरून येणाऱ्या उलटया ट्राफिकला न जुमानता घुसली. कमाल वाटली मला. मस्तच चाललंय की सगळ्याचं. येणाऱ्या भविष्यकाळात भर रहदारीच्या रस्त्यात मधेच गाडी आहे तशी उभी करून आपली कामें करून येणारी माणसेही निर्माण होतील आणि आपणही या कुठेही उभ्या केलेल्या गाडयांना वळसे घालत पुढे जात राहू.

मनाची सुद्धा सोडल्यानंतर काय होणार दुसरं?

आज प्रत्येकाला खरं तर मनोमन हे माहित्ये की हे वागणं चुकीचं आहे, जीवावर बेतणारे आहे पण काही सुजाण नागरिक सोडले तर कोणी या बाबतीत सुधारायचं नावच घेत नाहीये. यात दोष कोणाचा वगैरे मुद्द्यांमध्ये शिरायचंच नाही मला कारण गाठ आपल्या जीवाशी आहे इतकं पुरेसं नाही का? परदेशात वाहन परवाना देताना कडक नियम असतात आणि सहजासहजी परवाना मिळतही नाही. आपल्या इथलं काय बोलावं? इथे किती गंभीरपणे आणि काय परीक्षा होतात सर्वांना माहित्ये.

कुठलाही नियम केला की मुळात आधी त्यातून पळवाट कशी काढायची हेच शोधण्याची मानसिकता झालेली आहे आपली. आपण जशी सार्वजनिक स्वच्छता पाळूच शकत नाही तसच कुठलेही नियमही पाळूच शकत नाही हे दुर्दैव नाही तर आपण स्वतःहून अंगिकारलेलं सामाजिक सत्य आहे. सगळं आपल्याच हातात आहे खरं तर पण आपण मनावर घेत नाही. 

काय करुया? जरा पुन्हा एकदा (किंवा बहुदा पहिल्यांदाच) सगळे नियम तरी नीट माहित करून घेऊया का? प्लीज? रोज रोज आपल्या आणि इतरांच्या जीवाशी नको खेळूया. कुठे पोचायला झाला थोडा उशीर तर चालेल पण सिग्नल पाळूया. ही जबाबदारी घेण्यात आता उशीर करून चालणार नाही.

Thursday, November 7, 2013

त्या तिघीजणी...



त्या तिघीजणी मला “मामी” फिल्म फेस्टिवलमधे भेटल्या.
साधारण एकाच वयोगटातल्या पण वेगवेगळ्या देशातल्या.

"वाजमा"
अफगाणिस्तानातल्या “वाजमा”ला सर्वात आधी भेटले. काबुल मधे राहणारी ही २० वर्षांची विद्यार्थिनी, आपल्या प्रियकराच्या प्रेमाला भुलून सामाजिक नीतिमत्तेचे काटेरी कुंपण कळत-नकळत ओलांडते आणि अर्थात त्यात ती रक्तबंबाळ होते ही तिची गोष्ट. मुस्ताफाच्या प्रेमात पडून, त्याला चोरून भेटत असताना आपण गरोदर असल्याचं तिला कळतं आणि मग तिची फरफट सुरु होते आपल्याच घरात. अफगाणिस्तानात या कृत्याला तुरुंगवास हीच शिक्षा किंवा सरळ कुठल्या तरी खेड्यात जाऊन मुलाला गुपचूप जन्म देऊन यायचं हा एक पर्याय. गर्भपात बेकायदेशीर असल्यामुळे तो उपाय अशक्यच. 
“तू माझा आत्मसन्मान आणि प्रतिष्ठा मातीत मिळवली आहेस” असं म्हणून तिचे समाजाला घाबरणारे वडील तिला अक्षरशः पायाखाली तुडवतात, मारून टाकीन म्हणतात. मुस्तफा तर कानावर हात ठेवतो. ही अशी कथा आपण अनेक वेळा हिंदी सिनेमांमध्ये पाहिलीये. परंतु जेव्हा ती काबुलमधे घडत असते तेव्हा तिथली कट्टर आणि बुरसटलेली सामाजिक व्यवस्था आजही या प्रश्नाला वेगळेच परिमाण देते. शेवटी वाजमाला भारतात गर्भपातासाठी एकटीलाच पाठवलं जातं. एयरपोर्टवर सर्वांचा निरोप घेताना वाजमाचा गळा भरून येतो आणि कसबसं आपलं रडू दाबत जाणाऱ्या सुंदर वाजमा या अफगाणी युवतीची अगतिकता अधोरेखित होते.

दुसऱ्या दोघीजणी फ्रेंच. अर्थातच मुक्त समाजातल्या. पण म्हणून त्यांच्यासमोर समस्या नाहीत असं नाहीच.
एमा आणि एडेल
१५ वर्षांची हायस्कूलमधे जाणारी एडेल ही एक आकर्षक, भोळी मुलगी भेटली ती “ब्लू इज द वार्मेस्ट कलर” मधे. वर्गातल्या मुलांचं अटेंशन मिळणाऱ्या एडेलला मात्र मुलाबरोबरच्या नात्यात काहीतरी कमी असल्यासारखं वाटतं. काय ते कळण्याइतकी ती मोठीही नाहीये. तिचं भावविश्व तसं शाळा आणि घर यातच सीमित आहे. योगायोगाने तिला एमा नावाची युनिव्हर्सिटीत शिकणारी पेंटर मुलगी एका गे बारमधे भेटते. तिच्याशी काहीतरी कुठेतरी खटकन जमतं. भेटी-भेटींमधून एकमेकांबद्दल वाटलेलं मुळातले आकर्षण एका वेगळ्या शारीरिक पातळीवर जातं. आणि एडेलला वाटत असलेली कमतरता एमामुळे भरून निघते. समलैंगिक संबंधांमधे आनंद गवसलेली ही सुंदर एडेल पुढे त्याही नात्यातल्या असूया, असुरक्षितता यासारख्या नैसर्गिक भावना अनुभवते आणि समोर येईल तसं आयुष्याला तोंड देत जगत रहाते. मुक्त असणाऱ्या समाजातही एडेलला सुरुवातीला शाळेतल्या मैत्रिणींकडून अवहेलना सहन करावी लागतेच.



इसाबेल

तिसरी युवती भेटली ती “यंग एन्ड ब्युटीफुल” मधली इसाबेल. १७ वर्षांच्या इसाबेलला आपल्यात निर्माण होणाऱ्या स्त्रीसुलभ, नैसर्गिक लैंगिक भावनांबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण होतं आणि ते कुतूहल शमवण्यासाठी ती वेगवेगळे अनुभव घ्यायला सिद्ध होते. अगदी चार-चौघांसारखी सामान्य सुरक्षित कुटुंब असलेली ही इसाबेल स्वखुशीने हाय-प्रोफाइल प्रोस्टीट्युट बनते. त्यातून तिचं लैंगिक संबंधांविषयी असलेलं आकर्षण आणि उत्सुकता शमत नाही उलट वाढीला लागते आणि अगदी सहज पैसेही मिळू लागतात. घरच्यांपासून लपवून ती स्वतःची ही अशी वेगळ्या नावाने वेगळी ओळख निर्माण करते जी अर्थातच समाजाला उघडपणे मान्य नसलेल्या अशा व्यवसायात. शिवाय त्याबद्दल कुठलीही खंत किंवा गिल्ट नाही कारण जे स्वीकारलय ते स्वतःहून, मर्जीने. ती जे करत्ये ते तिला आवडतंय. त्यामुळे काम झालं की पैसे घ्यायचे. कोणी क्लायंट काही वावगं बोलला तरी त्यामुळे स्त्रीत्वाचा अपमान झाला वगैरे असलं काही नाही. पैसे घेऊन सरळ घरी. मग परत इंटरनेटवर आलेले मेसेजेस पाहून नव्या उत्साहाने पुन्हा तेच.




या वर्षीच्या मामीमधे खूप सिनेमे पाहिले. पण मनात घर करून राहिल्या या तिघी. यासाठी की या एकाच वयोगटातल्या मुली ज्या देशात रहात होत्या तिथल्या सामाजिक व्यवस्थेतल्या मुक्तपणा किंवा बुरसटलेपणामुळे त्यांना वेगवेगळ्या परिणामांना तोंड द्यावं लागलं. फ्रान्समधल्या एमा आणि एडेल जर वाजमाच्या काबुलमधे रहात असत्या तर? किंवा आपल्या भारतात असत्या तर? आपल्यातल्या या सुप्त आणि समाजात अस्वीकृत अशा उर्मीचं त्यांनी काय केलं असतं? गर्भपात करायला वाजमाला तिच्या वडिलांनी भारतात पाठवलं. ती परत येऊन पुन्हा आपलं आयुष्य सुरु करेल. पण याच पित्याच्या पोटी एडेल आली असती तर तिचा हा प्रश्न त्यांनी कसा सोडवला असता? कारण मुळात सोडवावा असा हा प्रश्न नाहीच. हे एक कटू वाटणारं पण तितक्याच समजूतदारपणे स्वीकारलं गेलं पाहिजे असं सत्य आहे. माणसांमधलं आणि म्हणून समाजामधलं. भारतात या दोघींचं काय झालं असतं? कदाचित काबुलमधे त्यांना मारून टाकलं असतं किंवा बहिष्कृत जीवन जगावं लागलं असतं. त्या मानाने भारतात त्यांना विचित्र आणि अब्नोर्मल म्हणून का होईना पण जगता नक्कीच आलं असतं.
आणि वाजमा जर पाश्चात्य देशात रहात असती तर तिची चूक ही चूक ठरली असती का?

आजपर्यंत भारतीय सिनेमांमध्ये बहुत करून ज्या “इसाबेल” होत्या त्या प्रत्येकीची काहीतरी एक कहाणी होती. परिस्थितीमुळे या व्यवसायात आलेल्या, आणल्या गेलेल्या, फसवल्या गेलेल्या, कुटुंबाला पोसण्याची जबाबदारी आल्यामुळे इथे आलेल्या अशा मुलींच्या तुलनेत फ्रान्समधली इसाबेल अगदीच वेगळी. तिच्या या प्रोस्टीट्यूट होण्यामागे कुठलीही सोशिक कहाणी नाही. तिला ते आवडतं आणि कुठलही गिल्ट न बाळगता ती ते बिनबोभाट करते. आपण आपल्या आई-वडिलांच्या भावनांना दुखावतोय असं तिला नाही वाटत. कारण तिथेही कुटुंबव्यवस्था असली तरी तरुण झाल्यानंतर स्वतःच आयुष्य हे स्वतःला हवं तसं जगण्यासाठी इसाबेल रुथलेस बनते. ती नाही आई, वडील, भाऊ यांना काय वाटेल, ते कोलमडून जातील का असा विचार करत. काबुल मधल्या वाजमाच्या आणि फ्रान्समधल्याच एडेलपेक्षाही ती तडफदार आणि रोक-ठोक.

या तिघितली एडेल माझ्या मनात जरा जास्तच घर करून राहिलीये. तिचा प्रश्न हा तिने निर्माण केलेला नव्हता. तो निसर्गाने तिच्याकडे सोपवला होता. त्याचं अवडंबर न करता, आपल्या कुवतीप्रमाणे समजून घेत ती त्याला सामोरी गेली, न घाबरता...म्हणून ही एडेल अगदी अजूनही माझ्याबरोबर आहे. निष्पाप, साधी अगदी आपल्यातली. 

माझ्या आजूबाजूला अशी कोणी एडेल मला दिसली तर तिच्याकडे मी योग्य त्या आदरानेच बघितलं पाहिजे आणि तिला अगदी सहजपणे मी स्वीकारलं पाहिजे हे ही एडेल मला मूकपणे सांगून गेलीये.


Monday, October 7, 2013

आयुष शाळेत जातो.



मैत्रिणीबरोबर तिच्या गावी गेले होते तेव्हाची गोष्ट.
आम्ही गाडीतून जाताना तिच्या गावातल्या फार्म हाउसवरची मेस सांभाळणारा एक नेपाळी तरुण, त्याची बायको आणि मुलगा बरोबर होते. मी एक-दोनदाच त्या छोटयाकडे पाहिलं होतं. तो हसरा होता पण अख्ख्या २-२.३० तासांच्या प्रवासात बोलला मात्र काहीच नव्हता.

गावात पोहोचलो. घरी गेलो आणि हा छोटा एकदम खुलला. मैत्रिणीने नव्यानेच पाळलेल्या “जिवा” कुत्र्याबरोबर आणि छोटया “सिकंदर” बोक्याबरोबर अगदी मनसोक्त खेळला. त्याच्या लहेजामधे तो “जुवा” आणि “सिकांदार” अशा हाका मारत होता. मला मज्जा वाटली. ३ वर्षांचा मुलगा बाकी काही बोलत नाही अजून हे लक्षात आलं. एखाद-दोन शब्द बस. संध्याकाळी तिथेच “क्वेस्ट” या शिक्षण प्रकल्पाचा सर्वे-सर्वा असलेला निलेश निमकर भेटला त्याने काळजीने या छोट्याचा म्हणजे आयुषचा विषय काढला. तो म्हणाला की त्याला कुठल्याच भाषेत एक वाक्य बोलता येत नाहीये. एव्हाना त्याला यायला हवंय. त्याच्याशी कुठल्या तरी एका भाषेत तरी बोललं गेलं पाहिजे. त्याच्या मातृभाषेत म्हणजे नेपाळी मधे तरी. मग लक्षात आलं की मुलाला इंग्लिश किंवा हिंदी यावं म्हणून आई-बाबा नेपाळीमधे बोलण्याच्या विरोधात आहेत. त्यामुळे आपली मातृभाषा सतत त्याच्या कानावर पडत नाही. काही शब्द सोडले तर त्याला स्वतःला व्यक्त करायला वाक्ये म्हणता येत नाहीत.

मला आणि मैत्रिणीला स्फुरण चढलं. या आयुषशी आपण खूप बोलायचं. लहान वयात कितीही भाषा मुले पटकन आत्मसात करू शकतात. मग मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांत आम्ही आयुषला आकडे, अक्षरं बोलायला शिकवू लागलो. तो ही अगदी हसतमुखाने जमेल तसं बोलू लागला. मग गावातल्या शाळेत त्याने जावं असं ठरवून दुसऱ्या दिवशी आयुषला घेऊन मी आणि मैत्रीण शाळेत पोचलोदेखील. गावातली छोट्यांची शाळा. तिथेही आयुष त्या दिवशी हसत हसत इकडे-तिकडे बघत होता. जमेल ते आणि तसं शिकत होता. मी आणि मैत्रीण खुश झालो.

छोटयाशा आयुषला माझ्या मैत्रिणीचा हात धरून शाळेत जाताना पाहून मला वाटलं की किती नशीबवान मुलगा आहे हा. याच्या आजूबाजूला शिक्षणक्षेत्रात अतिशय जागरूकपणे आणि आपले जीवन त्या कामी वाहून टाकून काम करणारी सुशिक्षित, प्रगल्भ माणसे आहेत. त्यांचं याच्यावर लक्ष आहे आणि याने शिकावं म्हणून ते आग्रहाने प्रयत्न करताहेत. त्याच्या नेपाली आई-वडिलांना शिक्षणाचं महत्त्व ते समजावू शकतील.

गावातल्या शांत आणि नैसर्गिक वातावरणात मोकळेपणी वावरणारा, कुत्रा आणि मांजर ज्याचे खरे दोस्त आहेत(कारण त्यांना भाषेची गरज नाही) असा हा आयुष पहिल्या दिवशी शाळेतून आला आणि जीवाकडे ज्या एका वेगळ्याच एनर्जीने धावत आला, ते पाहून मला खात्रीच पटली की आपण कोणाच्या सहवासात मोठे होतो हे किती महत्वाचं आहे. या मंडळीच्या नजरेस हा मुलगा न पडता तर तो कदाचित शाळेत गेलाही नसता. असाच इकडे-तिकडे करत मोठा झाला असता आणि कदाचित वडिलांसारखंच कुठेतरी काम करत असता. पण आज या लहानग्याच्या आयुष्याला एक दिशा मिळालीये. तो पुढे किती शिकेल, काय करेल आत्ता सांगता येणार नाही. पण त्याला एक संधी तर मिळाली. अनेकांना ती सुद्धा मिळत नाही.


सहज खेळता-बागडता, गावातल्या हिरवाईतून शाळेत जाता जाता, शिक्षणाचं शहरात असतं तसं कुठलंही प्रेशर न घेता आयुष आपलं आयुष्य अगदी सहज घडवेल ही शक्यता आता त्याच्या बाबतीत निर्माण झालीये.
पहिल्याच दिवशी खांद्यावर टेडी बेयरच दप्तर आणि हातात सफरचंद घेऊन शाळेच्या दिशेने पावलं टाकणारा आयुष कुठपर्यंत पोचेल हे येणारा काळ ठरवेल. पण आता त्याच्यासाठी पाटी आणि खडू घ्यायला हवेत आणि वही सुद्धा हे ठरवणारी (त्याच्या आई-वडिलांव्यतिरिक्त) मोठी मंडळी जोपर्यंत त्याच्या आजूबाजूला आहेत तोपर्यंत त्याची वाट चुकणार नाही ही खात्री वाटत्ये.